संपूर्ण जगात आईसारखे दुसरे कोणतेही दैवत नाही : डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज

लातूर दि. ११ :  या संपूर्ण जगात आईसारखे दुसरे कोणतेही दैवत नाही.म्हणूनच मातृदेवो भव  असे म्हटले जाते, असे प्रतिपादन वसुंधरारत्न ,शतायुषी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी केले.
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज सत्संग मंडळ,लातूरच्यावतीने डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा ८३ वा सत्संग सोहळा नुकताच  लाल बहादूर शास्त्रीकॉलनी नवीन रेणापूर नाका, मुळे विटभट्टी शेजारी आर्वी,लातूर येथे पार
पडला. त्यावेळी उपस्थित भाविकांना आशिर्वचन  देताना महाराज बोलत होते. या  सोहळ्याचे आयोजन डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज सत्संग मंडळ,लातूरच्या संयोजक सौ. लताताई मुद्दे यांनी केले होते तर आयोजक अशोक संभाजीराव
पटवारी, चंद्रकांत संभाजीराव पटवारी, बालाजी संभाजीराव पटवारी  व समस्त पटवारी  परिवार  हे होते. आपल्या आशिर्वचनात  डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज पुढे म्हणाले की, समाजात वावरतांना  चांगल्या माणसांच्या
अंतःकरणाची प्रवृत्ती नेहमी चांगलीच असते. अशा व्यक्तींच्या शब्दात, दृष्टीमध्ये खूप सामर्थ्य असते. आजघडीला मनुष्याचे आचार - विचार, आहार -विहार बदलत चालले आहेत. परिवर्तन हा काळाचा स्वभाव आहे, त्याला मान्यच
केले पाहिजे.  मुळात माणूस संस्कारी प्राणी आहे. समाजात कोणत्याही परिस्थितीत माणूस आपला संस्कार, स्वभाव सोडू शकत नाही. दैनंदिन जीवनात प्रत्येकाला सुख हवे असते. सुखाची अपेक्षा असते. त्या सुखाच्या
प्राप्तीसाठी मनुष्य प्रसंगी स्वार्थी वृत्तीला जवळ करण्याचा प्रयत्न करतो, असे अनेकदा पाहायला मिळते. मात्र, मनुष्याने अशा लोभाच्या,मोहाच्या प्रसंगापासून स्वतःला सावरण्याचा, दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
समाजात वावरतांना  परस्त्री मातेसमान मानून चालले पाहिजे. आई ही जशी प्रत्येकाची प्रथम गुरु असते तसेच ती प्रत्येकाचे प्रथम आद्य दैवत असते. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या माता - पित्याची सेवा ईश्वरी सेवक समजून केली पाहिजे, असे डॉ. शिवलिंग शिवाचार्य म्हणाले. मानवी जीवनात संस्काराचे महत्व अनन्यसाधारण असे आहे. संस्काराशिवाय मनुष्याची कल्पनाही
करवत नाही. सत्संग मंडळाच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या या सत्संग सोहळ्यामुळे समाजातील विविध घटकातील भाविक एकत्रित येत असल्याचे पाहावयास मिळते. त्यामुळे खऱ्या अर्थाने समाज एकसंघ होण्यास मदत होत असल्याचे डॉ. शिवलिंग शिवाचा महाराजांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी  सत्संग मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच पटवारी
परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले.